
एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी
आमदार शेखर निकम यांची पावसाळी अधिवेशनात मागणी
तुषार गोरे :– दाभोळ खाडीतील मासे मृत प्रकरणी शासनाने एमआयडीसी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच केमिकलयुक्त दूषित सांडपाणी सोडणाऱ्या संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत. याचबरोबर भोई समाजाला शासनाकडून व संबंधित कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात केली.
गेल्या चार दिवसांपूर्वी दाभोळखाडीत मासे मृत पडल्याची घटना समोर आली. या संदर्भात दाभोळखाडी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संपर्क साधून माहिती दिल्यानंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा करत मृत मासे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
या विषयाच्या अनुषंगाने आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात हा विषय उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, लोटे औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांमधून गेल्या चार दिवसांपासून केमिकलयुक्त दूषित सांडपाणी सोडल्यामुळे दाभोळ खाडीतील दहा गावांमधील मासे मृत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गेले अनेक वर्ष दाभोळ खाडी संघर्ष समितीचे अध्यक्ष रामचंद्र पडवळ याविषयी शासनाकडे तक्रार करीत आले आहेत. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तरी याप्रकरणी एमआयडीसी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या मृत मासे विषयी भोई समाजाला नुकसान भरपाई शासन व संबंधित कंपन्यांकडून मिळावी. याचबरोबर संबंधित कंपन्यांवर गुन्हे देखील दाखल करावे अशी मागणी केली.