
लांजा: मुंबई-गोवा महामार्गावर देवधे येथे शनिवारी सायंकाळी अपघात झाला होता. या अपघातातील मोटारसायकल स्वाराच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र सुपल (वय ५०, मूळ रा. टीआरपी रोड, के.एस. गॅस, गणेश कॉलनी नाचणे, ता.जि.रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील होंडा शाईन दुचाकी क्रमांक (एमएच.०८ एस ९७५५) घेऊन रत्नागिरीहून लांजाकडे येत असताना सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास बाराचाकी मालवाहू ट्रक क्रमांक (एमएच.०९ इएम ७८९६) यांच्यात मुंबई-गोवा महामार्गावर देवधे फाट्याच्या पुढे एअरटेल टॉवरच्या समोर रस्त्यावर अपघात झाला होता. हा ट्रक विजय आत्माराम काळोखे (वय ४२, रा. चचेगाव, ता. कराड, जि. सातारा) चालवीत होता. या अपघातात दुचाकीस्वार सुपल यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
ट्रक चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता, बेदरकारपणे भरधाव वेगाने जात दुचाकीस्वाराला धडक देत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याने ट्रक चालकावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६, २८१, १२५ (अ), १२५ (ब), मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे अधिक तपास करत आहेत.