
मच्छीमारांसाठी स्थापन झालेल्या नवीन दोन्ही महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू करण्याचे निर्देश…
मुंबई : कारंजा, आनंदवाडी, मिरकरवाडा व ससून डॉक येथील मत्स्यबंदरे ही कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असून यातून तेथील लोकांच्या आर्थिक उन्नतीस चालना मिळेल. या मत्स्य बंदरांच्या ठिकाणी सुरू असलेली विकास कामे गती व पारदर्शकतने पूर्ण करावीत, असे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
मंत्रालयात मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाची आढावा बैठक मंत्री श्री. राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
बैठकीला विभागाचे आयुक्त किशोर तावडे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक, उपसचिव श्री. जकाते, सह आयुक्त दिनेश देवरे, प्रादेशिक उपायुक्त प्रकाश भादुले, यासह विभाग व महामंडळातील अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. राणे यांनी महाराष्ट्र मत्सोद्योग विकास महामंडळाच्यावतीने सुरू असलेल्या मत्स्य बंदरांचा विकास व आधुनिकीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. यामध्ये मुंबई शहरातील ससून डॉक , रायगड जिल्ह्यातील कारंजा (उरण), सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी व रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा या मासेमारी बंदर विकासासाठी होत असलेल्या कामांची माहिती घेतली. कोकणातील सात विविध ठिकाणी होत असलेल्या मासे हाताळणी केंद्रातील कामांचा आढावा घेतला.
येथील बंदरांच्या ठिकाणी मासे लिलाव शेड, बर्फ कारखाना, वर्कशॉप, मासेमारीच्या जाळ्यांची दुरुस्ती व निगा राखण्यासाठी शेड, प्रसाधनगृह यासह विविध काम केली जात आहेत. सध्या सुरू असलेल्या कामांसाठी ससून गोदी मच्छीमार बंदर येथील विकास कामांसाठी 92 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आले आहे, आनंदवाडी मत्स्य बंदर विकास कामांसाठी 88 कोटी 44 लाख रुपये, मिरकर वाडी 26 कोटी 23 लक्ष रुपये कारंजा येथील मत्स्य बंदर विकास कामांसाठी 149 कोटी 80 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ आणि महाराष्ट्र भूजलाशय मच्छीमार कल्याणकारी महामंडळ यांची घोषणा राज्य शासनाने ऑक्टोबर 2024 मध्ये केली आहे. यासाठी मुंबई व नागपूर येथील कार्यालयातील सध्याच्या कार्यरत यंत्रणेमार्फत काम केले जावे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू होण्यासाठी विभागाने कार्यवाही करावी असे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.