
मुंबई :- तलाठी भरती परीक्षेपासून कोणताही परिक्षार्थी वंचित राहणार नाही नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा सुरळीत पार पडतील, आशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच परीक्षार्थींना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे.
तलाठी भरती परीक्षेदरम्यान टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळं आज पाहिल्या सत्रात सकाळी ९ वाजता परीक्षा होऊ शकली नाही. यासंदर्भात टीसीएस कंपनीकडून राज्य समन्वय कार्यालयास परिक्षा उशीरा सुरु होईल असं कळवण्यात आलं होतं.
टीसीएस कंपनी आणि त्यांचा डेटा सेंटर यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर हा तांत्रिक बिघाड शोधून परीक्षा राज्यातील ३० जिल्हे व ११५ टीसीएस केंद्रांवर सकाळी ११.०० वाजता सुरु करण्यात आल्याचं विखे पाटलांनी स्पष्ट केलं. राज्य समन्वयकांनी सर्व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करुन प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांना आणि त्याप्रमाणं सर्व परीक्षा केंद्रांवरील परिक्षार्थांना याची सूचना देण्यात आली होती, असंही विखे पाटलांनी सांगितलं.
आज उर्वरीत दोन्ही सत्रातील परिक्षा नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरु झाल्याबद्दल विखेंनी दिलगीरी व्यक्त केली. तसेच सर्व्हर डाउन घटनेची चौकशी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मार्फत करणार असल्याचं जाहीर केलं. तसेच पुढील सर्व परीक्षा वेळापत्रकानुसार सुरळीत पार पाडण्यासाठी विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावं, असा दिलासाही विखे पाटील यांनी दिला आहे.


जाहिरात
