
ठाणे | ठाण्यातील शिवाई नगर येथील उन्नती मैदानावर कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने सिताराम राणे यांनी आयोजित केलेल्या मालवणी महोत्सवाचा समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष सिताराम राणे, स्नेहलता राणे, हाउसिंग फेडरेशनचे संचालक विनोद देसाई आदी उपस्थित होते. राणे दाम्पत्याने भव्य भित्तीचित्र सादर करून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
सिताराम राणे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या रूपाने प्रथमच मुख्यमंत्र्यांची उणीव मालवणी कार्यक्रमात पूर्ण झाली. यावेळी मुख्यमंत्री जनतेला संबोधित करताना म्हणाले, असा मालवणी सण म्हणजे रसिक आणि चवप्रेमींसाठी जणू पर्वणीच! ते म्हणाले की, फणस वरून काटेरी असला तरी आतून गोडच असतो आम्ही कोकणचे लोक असेच आहोत.
कोकणच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण स्वतः आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटिबद्ध आहोत, असे सांगून ते म्हणाले की, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर खराब झालेला मुंबई गोवा महामार्ग लवकरच ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे मध्ये अपग्रेड करण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे कोकणात पर्यटनाला वाव असल्याने चांगल्या पायाभूत सुविधा आणि उत्तम कनेक्टिव्हिटी तयार करण्यासाठी सिंधुदुर्गातील किनारी रस्त्यांचेही रुंदीकरण एम एस आर डी सी च्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.