
रायगड- दुर्गराज रायगडावर न भुतो,ना भविष्यति असा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे.ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा २ जूनला पडल्यानंतर आज तारखेनुसार किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे.या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत.यानिमित्ताने रायगडसह संपुर्ण महाराष्ट्रभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान रायगडावर पार पडत असलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजांनी शिवाजी महाराजांनी केलेली धर्माची व्याख्या सांगितली. संभाजीराजे म्हणाले, ‘शिवाजी महाराजांची धर्माची व्याख्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. ते धर्मांध नव्हते. आदिलशाही धर्मांध होती. औरंग्या धर्मांध होता. दुसऱ्यांच्या धर्मावर अत्याचार करून ते आपला धर्म पुढे घेऊन जात होते.मात्र,शिवाजी महाराजांनी तसं केलं नाही. महाराज आपल्या रुढी-परंपरा जपायचे म्हणूनच त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी कधीच दुसऱ्यांच्या धर्मावर अत्याचार केला नाही. पण आपल्या धर्मावर कुणी चालून आलं, तर त्याची गयही केली नाही’ असं मत संभाजीराजांनी व्यक्त केलं.
तसंच उपस्थित आमंत्रित आमदारांना देखील त्यांनी आवाहन केलं. यावेळी ते म्हणाले की, ‘रायगड हा किल्ला पुरात्तव खात्याकडून महाराष्ट्र शासनाकडे यावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.कारण,रायगड प्राधिकरण समितीला गडाच्या डागडुजीसाठी कोणतेही काम प्रशिक्षित कारागीरांना घेऊन करायचे असेल तर त्यासाठी पुरात्तव खात्याकडे सतत फेरे मारावे लागतात.त्यामुळे सर्व आमदारांनी एकत्र येऊन रायगड सारखे किल्ले महाराष्ट्र शासनाकडे यावेत यासाठी प्रयत्न करा’,असे आवाहन केले आहे.