
रत्नागिरी l 22 मार्च- जागतिक स्तरावरील आर्किटेक नेमून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य असे स्मारक उभारण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी केले. पालकमंत्री डॉ. सामंत यांनी आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी कसबा येथे सरदेसाई यांचा वाडा व तेथील परिसराची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, जागा मालक सुभाष सरदेसाई, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, येथील सरदेसाई यांनी स्मारक उभारण्यासाठी जमीन देण्याची सकारात्मक भूमिका घेतली आहे. लवकरात लवकर स्मारक होण्यासाठी पावले टाकत असून, 29 मार्च रोजी असणाऱ्या बलिदान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. खर्च किती झाला तरी तो करण्यासाठी शासन तयार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पुढच्या पिढीला समजले पाहिजे, अशा प्रकारे स्मारक उभारण्यात येणार असून, लवकरच याबाबत आराखडा तयार करून स्मारक उभारण्यात येणार आहे. पुढील 90 दिवसांमध्ये याबाबत निविदा निघण्यास हरकत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जागा मालक सुभाष सरदेसाई यांनी पालकमंत्री डाॕ सामंत यांना जागेबाबत माहिती सांगितली तसेच मागील इतिहासही सांगितला.