
बुद्ध पौर्णिमा म्हणजेच बुद्ध जयंती. बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण आणि उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.
हा दिवस गौतम बुद्धांची जयंती आणि त्यांचा निर्वाण दिवस देखील आहे. भगवान बुद्धांना या दिवशी ज्ञानप्राप्ती झाली. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. यातील अनेक देशांत बुद्ध पौर्णिमेची सार्वजनिक सुट्टी असते. भारतातदेखील बुध्द पोर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.
वैशाख शुद्ध पौर्णिमेला सिद्धार्थ अर्थात गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले. म्हणून ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमेच्या रुपाने साजरी होते. भगवान बुद्धांनी जगाला एक नवा दृष्टिकोन दिला. त्यांनी लोकांच्या दु:खांची कारणं सांगून त्या दु:खांचं निवारण देखील सांगितलं. बिहारच्या बोधगयामध्ये बोधीवृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच कुशीनगरमध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं. जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ आणि ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. यासाठी ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.