
देशातील आणीबाणीच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली असून, त्यावेळी काँग्रेस पक्षाने संविधानाचा अपमान केला. दीड लाखांपेक्षा जास्त समाजसेवकांना तुरुंगात टाकण्याचे काम काँग्रेसने केले.
ठाणे : देशातील आणीबाणीच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली असून, त्यावेळी काँग्रेस पक्षाने संविधानाचा अपमान केला. दीड लाखांपेक्षा जास्त समाजसेवकांना तुरुंगात टाकण्याचे काम काँग्रेसने केले. त्यामुळे या कटू घटनेची आठवण करून देणे आणि हा दिवस काळा दिन म्हणून पाळणे गरजेचे आहे, असे मत भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ठाण्यातील वर्तकनगर भागातील भाजपच्या विभागीय कार्यालयात शुक्रवारी ‘संकल्प से सिद्धी तक’ ही कार्यशाळा पार पडली. यावेळी चव्हाण यांच्यासह मंत्री गणेश नाईक आणि नितेश राणे उपस्थित होते. कार्यशाळेत ठाण्यासह कोकणपट्ट्यातील आजी-माजी जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, आजी-माजी आमदार आणि खासदार उपस्थित होते. बैठकीनंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भाजपच्या संघटन पर्वाचा अंतिम टप्पा सुरू आहे. आतापर्यंत ८० संघटनात्मक नेमणुका झाल्या आहे तर, १२०० पेक्षा जास्त मंडळांच्या नेमणुका झाल्या आहेत. नवीन नेमणूक झालेले जिल्हाध्यक्ष आणि मंडळ अध्यक्ष यांsना मंडळ रचना कशा कराव्यात, याची माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, असे चव्हाण म्हणाले.



देशाची अर्थव्यवस्था सध्या चौथ्या स्थानावर आहे पण, लवकरच ती तिसऱ्या स्थानावर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोड, मेट्रो प्रकल्प, रस्ते आणि रेल्वेचे जाळे विणले आहे. ‘वसुधैव कुटूंबकम’ याप्रमाणे जगाचे नेतृत्व करण्याची भारताची असणारी भुमिका मांडण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी यांनी केला. सिंदूर ऑपरेशन राबवून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. अशाचप्रकारे त्यांनी जनहितासाठी केलेल्या कामे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम ‘संकल्प से सिद्धी तक’ उपक्रमाद्वारे केले जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेऊन या उपक्रमाची राज्यात सुरवात करणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात केंद्र आणि राज्य सरकार सर्व सामान्यांसाठी काम करत आहे, हे दाखवून देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे चव्हाण म्हणाले. कोकणाला ७२० किमी समुद्र किनारा लाभला असून येथील मच्छीमारांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे, असेही ते म्हणाले.



‘११ वर्षांत अनेक विकासकामे’ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकवेळी देशाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचे काम करीत असून त्यांनी गेल्या ११ वर्षात अनेक विकासकामे केली आहेत. ही कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठीच ‘संकल्प से सिद्धी तक’ उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. तसेच प्रत्येक क्षेत्रात केंद्र आणि राज्य सरकार सर्व सामान्यांसाठी काम करत आहे, हे उपक्रमाच्या माध्यमातून दाखवून द्यायचे आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.