
*मुंबई-* भारतीय जनता पक्षाने राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा केली. मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष तसेच भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांचा यात समावेश आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जाहीर केली. राज्याच्या राजकारणात या घोषणेची चर्चा सुरू झाली असून पक्ष संघटनेला नव्या टप्प्यात नेण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली होती. त्यानंतर लगेच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणी व पदाधिकारी नेमणूक निवडणुकीनंतर करावी, असा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर संघटनात्मक बदलांची प्रक्रिया काळजीपूर्वक राबवली गेली, असे चव्हाण म्हणाले. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, बी. एल. संतोष, शिव प्रकाश तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करूनच ही यादी अंतिम करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पक्षाच्या घटनेप्रमाणे आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन योग्य व्यक्तींना जबाबदारी देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले. कोणाला पद द्यावे किंवा देऊ नये यापेक्षा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे आहे, परंतु मर्यादित पदांमुळे सर्वांना संधी देता येत नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले.
पदाधिकाऱ्यांची घोषणा करताना ज्यांना जबाबदारी मिळाली त्यांचे अभिनंदन करण्यात आले, पण ज्यांना या वेळी संधी मिळाली नाही त्यांच्याबद्दलही सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. अशा कार्यकर्त्यांना विविध आयामांतून कामाची संधी देण्याचा विचार केला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. पक्षाकडे अनेक मोर्चे आणि आघाड्या आहेत. त्यांची नावेही जाहीर करण्याची तयारी होती; मात्र सध्या प्रमुख मोर्चे आणि आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांचीच घोषणा करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मर्यादित पदांवर नियुक्ती करण्यात आली असून संघटनेची ताकद वाढवणे हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
*नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्तापदी निवड…*
नव्या नियुक्त्यांनुसार नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्तापदी निवड करण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोरगे, संजय भेंडे, रामदास कडस, केशव उपाध्ये, गोपीचंद पडळकर, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नेत्यांना प्रदेश पातळीवरील संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विविध भागांत काम केलेल्या या नेत्यांकडून पक्ष विस्ताराची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संजय कुटे, परिणय फुके चिटणीसपदी..
सरचिटणीसपदी निरंजन डावखरे, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनिल राणे आणि योगेश सागर यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. चिटणीसपदी मंगेश चव्हाण, संजय कुटे, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, अर्चना डेहणकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रविण घुगे, रेखा कुलकर्णी आणि भैरवी घाक यांची निवड करण्यात आली आहे. या पदांद्वारे संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. राज्यभरातील विविध भागांतून प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न या यादीत दिसून येतो.
युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक…
मोर्चा संघटनांबाबतही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला मोर्चा अध्यक्षपदी चित्रा वाघ तर ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी योगेश टिळेकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी मिहिर कोटेचा यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्यांमुळे पक्षाची संघटनात्मक रचना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विविध समाजघटक आणि वयोगटांपर्यंत पोहोचण्यासाठी मोर्चा संघटनांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही चव्हाण यांनी अधोरेखित केले.
संघटनात्मक फेरबदल करत नव्या नेतृत्वाला संधी…
एकूणच, भाजपने राज्यातील संघटनात्मक फेरबदल करत नव्या नेतृत्वाला संधी दिली आहे. निवडणुकीनंतर संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यभरात पक्षाची पकड वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मर्यादित संधी असूनही प्रत्येक कार्यकर्त्याला कामाची संधी मिळेल, अशी ग्वाही देत रवींद्र चव्हाण यांनी संघटनात्मक ऐक्याचा संदेश दिला. या नव्या नियुक्त्यांमुळे आगामी राजकीय घडामोडींमध्ये भाजपची भूमिका अधिक ठळकपणे दिसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*