मुंबईतील मतदानाची टक्केवारी घटण्यास जबाबदार कोण?; भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा सवाल…

Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडलं. मुंबईत बऱ्याच ठिकाणी मतदान संथ गतीनं सुरू होतं. त्यामुळं मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तिथे अनेक सुविधांचा अभाव दिसून आला. त्यावरून भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदारांचं हाल हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी राज्यात मुंबईतील सहा जागांसह एकूण १३ जागांसाठी सोमवार २० मे रोजी मतदान पार पडलं. यामध्ये मुंबईच्या सहा जागाचं सांगायच झालं तर मुंबईत मतदारांमध्ये मतदानासाठी प्रचंड उत्साहात सकाळी दिसून आला. तडाख्याच्या उन्हात सुद्धा मुंबईकर मतदानासाठी घराबाहेर पडले. परंतु, अनेक ठिकाणी मतदान संथ गतीनं होत असल्यानं याचा फटका मतदारांना बसला. यामुळं मतदारांना दोन ते तीन तास रांगेत उभं राहावं लागलं. अनेक ठिकाणी पंख्यांची, पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची सोय नव्हती. भर उन्हात मतदारांना अक्षरशः होरपळ सहन करावी लागली. या सर्वांचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला. मुंबईतील ६ मतदार संघात ५१ टक्के मतदान झालंय. तर दुसरीकडं मतदानासाठी होणाऱ्या विलंबामुळं सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप बघायला भेटले.
मुंबईत संत गतीनं मतदान प्रक्रिया : यंदा शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यानं उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी थेट लढत बघायला भेटत आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबईतील मुस्लिम वस्त्यांमध्ये मतदानासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला भेटला. भेंडी बाजार, गोवंडी, जोगेश्वरी, मालवणी या मुस्लिम बहुल भागात सकाळ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लावल्यानं मुस्लिम समुदायाची मतं कोणाच्या पारड्यात जातात याबाबत उत्सुकता आहे. तर दुसरीकडं हाच मुद्दा धरत ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान भेटणार आहे, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक संत गतीनं मतदान प्रक्रिया राबवण्यात आली, असा आरोप उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच या मुद्द्यावर ते न्यायालयातही जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

🔹️दरेकर यांचा घरचा आहेर :

तर उद्धव ठाकरे यांच्या आरोपाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे हे नेहमीचं रडगाणं आहे. मुंबईमध्ये संथ गतीनं मतदान होत असल्याची तक्रार सर्वात अगोदर आम्ही आयोगाकडं केली आहे. परंतु समोर पराभव दिसत असल्यानं त्यांनी सवयीप्रमाणं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करण्यास सुरुवात केलीय. ४ जून नंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी उद्धव ठाकरे आतापासूनच तयार करत आहेत. त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत, असंही फडवणीस म्हणाले. तर या मुद्द्यावर बोलताना भाजपा नेते, आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, आम्हाला सुद्धा मदतीच्या मर्यादा येतात. आचारसंहिता पोलीस आणि निवडणूक आयोग याच्या कचाट्यातून एका लिमिटच्या बाहेर आम्हाला काही करता येत नाही. परंतु निवडणूक आयोगाला नम्रपणे सुचवावंस वाटतं की, त्यांनी पूर्णपणे लोकांचा मतदारांचा तिथे असणारे रूम्स, व्हेंटिलेशन, अव्यवस्था याचा कुठलाही विचार केलेला दिसत नाही हे फार दुर्दैवी आहे. असा घरचा आहेर दरेकर यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.

🔹️मुंबईतील मतदानाची २०२४ ची टक्केवारी खालील प्रमाणे, कंसात २०१९ ची टक्केवारी…

▪️उत्तर मुंबई – ५५.५१ (६०.०९)

▪️उत्तर मध्य मुंबई – ५१.४२ (५३.६८)

▪️उत्तर पूर्व मुंबई – ५३.७५ (५७.२३)

▪️उत्तर पश्चिम मुंबई – ५३.६७ (५४.३७)

▪️दक्षिण मुंबई – ४७.७० (५१.५९)

▪️दक्षिण मध्य मुंबई – ५१.८८ (५५.०४)

🔹️उत्तर पूर्व मुंबई :

उत्तर पूर्व मुंबई मतदार संघामध्ये जवळपास १६ लाख मतदार आहेत. प्रचंड उष्णता असतानाही उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात मतदार केंद्रावर सकाळ पासूनच मतदानासाठी लांबच लांब रांगा दिसून आल्या. पण अनेक गैर सोयी असल्यानं याबाबत मतदान केंद्रावर मतदारांची नाराजी दिसून आली. ईव्हीएम मशिनीतील तांत्रिक अडचणीबाबत इथे १९ पेक्षा जास्त तक्रारी देण्यात आल्या आहेत. उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये विक्रोळी, भांडुप, मुलुंड, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात. यातील मुलुंड भागामध्ये उच्चभ्रू लोकांची वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे. परंतु येथील अनेक मतदान केंद्रांवर मतदार यादीत अनेकांची नावे सामील नसल्यानं अनेकांना मतदान न करता परत जावं लागेल. भांडुप पश्चिम येथील उषा नगर मधील ब्राईट हायस्कूल या मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या संपूर्ण गांधी कुटुंबाला मतदान न करता परत जावं लागलं. यामध्ये मुलुंड सर्वोदय नगर येथे राहणारे प्रवीण गांधी त्यांची पत्नी प्रविणा, मुलगा राहूल आणि मुलगी कोमल या चौघांची नावे मतदार यादीत नव्हती. विशेष म्हणजे मागच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतरही यंदा त्यांची नावे मतदार यादीतून गायब झाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

🔹️दक्षिण मध्य मुंबई :

दक्षिण मध्य मुंबई मतदार संघामध्ये धारावी या मुख्य आणि महत्त्वाचा मतदारसंघ आहे. परंतु येथे अपुऱ्या जागे अभावी दाटी-वाटीच्या जागेमध्ये मतदान केंद्र होती. या मतदान केंद्रावर सुद्धा अतिशय संथ गतीनं रांग पुढे सरकत होती. परंतु अनेक मुस्लिम मतदारांनी शेवटपर्यंत रांगेत उभं राहून मतदान केलं. विशेष म्हणजे धारावी, माटुंगा लेबर कॅम्प तसेच अणू शक्ती नगरचा काही भाग येथे मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अनेक मतदार केंद्रावर मतदारांची नावे यादीत नसल्यानं प्रचंड घोळ निर्माण झाला. निवडणूक अधिकारी यांच्याशी वादविवाद करून अनेक मतदारांना घरी जावे लागले. तसेच मोबाईल मतदान केंद्राच्या आत नेण्यास परवानगी आहे की नाही? असल्यास तो बंद करून न्यावा, या मुद्द्यावर सुद्धा या मतदारसंघात अनेक ठिकाणी वाद बघायला भेटले.

🔹️उत्तर मध्य मुंबई :

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना, विलेपार्ले, कुर्ला या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात सुद्धा सकाळी मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला. परंतु अनेक ठिकाणी संथ गतीनं होणारं मतदान, प्रशासकीय गैरसोयी तसेच निवडणूक कामातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव या अडचणीमुळं मतदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. कलिना मतदारसंघांमध्ये मतदान करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या नावानं यापूर्वीच मतदान झाल्याचं दिसून आलं. त्यामुळं येथे बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला. निवडणूक अधिकारी याबाबत चौकशी करत आहेत. वांद्रे पूर्व त्याचबरोबर वांद्रे पश्चिम मधील अनेक मतदान केंद्रांवर व्हील चेअरची कमतरता दिसून आली, यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना अनेक तास ताटकळत उभे राहावं लागलं.

🔹️दक्षिण मुंबई :

दक्षिण-मुंबई मतदार संघ हा उच्चभ्रू वस्तीचा परिसर असून या परिसरामध्ये पेडर रोड, केम्स कॉर्नर, बाबुलनाथ, मलबार हिल, मुंबादेवी, वाळकेश्वर, कुलाबा, शिवडी काळाचौकी, लालबाग, परळ, वरळी या भागात मतदारांच्या सकाळपासून रांगा लागल्या होत्या. या मतदारसंघात उबाठा गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात शिंदे गटाच्या यामिनी जाधव या निवडणूक लढवत असल्यानं थेट लढत ही शिवसेनेच्या दोन्ही गटात होत आहे. यासाठी येथे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर मेहनत घेतली. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा बघायला भेटल्या तर अनेक ठिकाणी मतदान करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले नाहीत. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांची पत्नी निता आणि मुलगा आकाश अंबानी यांच्यासोबत पेडर रोड येथील सेंट तेरेसा हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. परंतु येथे मतदानाची सर्वात कमी टक्केवारी दिसून आली.

🔹️उत्तर पश्चिम मुंबई :

उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये वर्सोवा या भागात चित्रपट कलाकारांची मांदियाळी आहे. येथे मतदानासाठी सकाळपासूनच भल्या मोठ्या रांगा दिसून आल्या. कलाकार रणदीप गुड गुडा, राजकुमार राव, रणवीर शौरी, अर्षद वारसी, अली असगर, शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी, मनोज वाजपेयी या सर्वांनी मतदान करत इतरांनाही मतदान प्रक्रियेत सामील होण्याचं आवाहन केलं. जोगेश्वरी पूर्व येथील मतदार संघात अरेच्या जंगलामध्ये १४ मतदान केंद्र तात्पुरत्या मंडपात उभारण्यात आली होती. यामधील एक मतदान केंद्र तर चक्क म्हशीच्या गोठ्यात होते. तरीसुद्धा या भागात मतदारांमध्ये मतदानासाठी फार मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. काही ठिकाणी अपुऱ्या जागे अभावी मतदानासाठी ये जा करताना नागरिकांना त्रास झाला. तरीही या भागात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं.

🔹️उत्तर मुंबई :

उत्तर-मुंबई मतदारसंघ हा भाजपासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. या भागात माझ्याकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील निवडणूक लढवत आहेत. या भागात मतदान करताना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून नागरिकांनी सकाळीच फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केंद्रावर गर्दी केली होती. परंतु अनेक भागात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यानं मतदानासाठी लांबच लांब रांगा दिसून आल्या. अनेक ठिकाणी नागरिकांना दोन ते तीन तास रांगेत ताटकळत उभं राहावं लागलं. अनेक ठिकाणी पंखे, पाणी, शौचालय या सुविधा नसल्यानं नागरिक हैराण झाले होते. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडं तक्रार केली. उबाठा गटाच्या नेत्या, राज्यसभा खासदार, प्रियंका चतुर्वेदी या स्वतः दोन तास रांगेत ताटकळत मतदान करण्यासाठी उभ्या होत्या. यावेळी त्यांनी सुद्धा रोष व्यक्त केला. या मतदारसंघात भाजपा उमेदवाराचा विजय नक्की मानला जात असून ते मोठ्या मताधिक्यानं विजयी होतात या भावनेने सुद्धा अनेक महायुतीचे मतदार मतदानापासून दूर राहिले. विशेष म्हणजे यंदा या मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत पाच टक्क्यांनी मतदान कमी झालंय.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page