ऑडीटोरीयम, पत्रकार भवन, इको टुरिझम, फुलराणी कक्ष, रत्नागिरी क्लब करण्याचा निर्णय…. खैर लागवडीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करु घ्या ; वन विभागाने मोफत रोपे द्यावीत -पालकमंत्री उदय सामंत…

Spread the love

*रत्नागिरी, दि. 2 (जिमाका) : पथदर्शी प्रकल्प म्हणून माध्यमिक शाळांतील मुलींसाठी प्रत्येक तालुक्यात 5 याप्रमाणे ‘फुलराणी कक्ष’ तयार करावेत. अभियांत्रिकी महाविद्यायलाच्या परिसरात सुसज्ज 10 कोटीचे ऑडीटोरीयम उभे करावे. एमआयडीसीच्या माध्यमातून 3 गुंठे जागा पत्रकार भवनसाठी देण्यात येत आहे. त्यासाठी चालू वर्षी 1 कोटी रुपये देण्यात येतील. आरेवारे येथील 96 एकर जमिनीवर इको टुरिझम विकसित करावे. त्याचबरोबर खैर लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना मोफत रोपे द्यावीत. त्यासाठी शेतकऱ्यांची  नोंदणी करुन घ्यावी, अशी सूचना वन खात्याला करतानाच अधिकारी आणि रत्नागिरीकर यांच्यासाठी रत्नागिरी क्लब उभारण्याची सूचनाही पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रांताधिकाऱ्यांना केली.*
           
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री. सामंत यांनी सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, पालकमंत्री महोदयांचे खासगी सचिव योगेश महांगडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते.


           
पालकमंत्री श्री. सामंत यांनी विभागनिहाय आढावा घेतला. ते म्हणाले, शासकीय पत्रकार भवनसाठी एमआयडीसीने 3 गुंठे जागा दिली आहे. ती जिल्हाधिकारी यांच्या नावे करुन सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार करावा. त्यासाठी यावर्षी 1 कोटी निधी दिला जाईल. अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात शहरातील विविध महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांसाठी 10 कोटींचे सुसज्ज ऑडीटोरियम उभा करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करावे. वन विभागाने अडीच कोटीमधून खैर वृक्षाची रोपे करावीत. सद्यस्थितीत असणारी 1 लाख रोपे शेतकऱ्यांना मोफत देण्यासाठी त्यांची नोंदणी करुन घ्यावी. जिल्ह्यात खैर लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
           
2 कोटीमधून आयटीआयचे नुतनीकरण करावे. गोमाता सरंक्षणासाठी नवीन रुग्णवाहिका दिली जाईल. जयगड आणि रत्नदूर्ग किल्ला सवंर्धनासाठी प्रत्येकी 2 कोटी निधी दिला जाईल. त्याबरोबरच प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या संघातील नदीमधील गाळ काढण्यासाठी प्रत्येकी 50 लाख निधी देण्याची सूचनाही जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी केली. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी स्मार्ट बनविण्यासाठी तसेच वाहन आदींसाठी 3 कोटीस मंजुरी दिली. पाली संगमेश्वर कळंबणीसह जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण  रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांना मंजुरी दिली. तसेच प्रातांधिकाऱ्यांनी रत्नागिरी क्लब निर्मिती करावी. त्यामधील अद्यावत जिमसाठी 50 लाख रुपये देण्याचे सूचनाही त्यांनी केली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page