
रत्नागिरी- कोकण आणि नैसर्गिक आपत्ती हे समीकरण आता पावसाळ्यात ठरलेले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कोकणात यावर्षी प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ४९१ गावे आणि वाड्या संभाव्य दरडग्रस्त असल्याची नोंद करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणात एकही गाव संभाव्य दरडग्रस्त नसल्याचे समोर आले आहे.
दरड कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांमार्फत आपत्ती व्यवस्थापन विभाग आपत्ती निवारणासाठी सज्ज झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या साथीला पोलिस प्रशासनावर व्यापक जबाबदारी देण्यात आली आहे. दरडग्रस्त गावांमधील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्याबरोबर स्थानिक यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली की दरड कोसळण्याच्या घटना घडत आल्या आहेत. यंदा देखील दरड कोसळण्याच्या घटना मुंबई-गोवा महामार्गावर घडल्या आहेत. नुकतेच रायगडाच्या पायथ्याशी असणार्या बावले गावात जमिनीला भेगा पडल्या आहेत. यामुळे कोकणातील संभाव्य दरडग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.