
*राजापूर / प्रतिनिधी:* राजापूर तालुक्यातील साखरी नाटे, नाटे भागात असलेल्या ऐतिहासिक घेरा यशवंतगडाच्या पडझड झालेल्या कामाची रत्नागिरीतील पुरातत्व विभागाच्या अभियंत्यांनी आज पाहणी केली. मागच्या आठवड्यामध्ये घेरा यशवंत गडाच्या नवीन कामाची पडझड झाली. या घटनेमुळे साखरी नाटे, नाटे तसेच आजूबाजूच्या गावांमधील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. नवीन काम झालेले आहे तर त्याची पडझड झाली कशी. त्याचप्रमाणे आजूबाजूचे सुद्धा चिरेबंदी बांधकाम कोसळण्याच्या अवस्थेमध्ये आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सूचना फलक लावण्यात आलेली नाही. स्थानिक ग्रामपंचायतींना सुद्धा कुठल्याही प्रकारची किल्ल्याच्या कामाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली नाही.
त्यामुळे पडझड होत असताना समजा पर्यटक असते तर त्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू शकली असती. एखादी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावेळी पुरातत्व विभागाची इंजिनियर विशाल भरसट यांनी पडझड झालेल्या कामाची तसेच उर्वरित किल्ल्याच्या कामाची सविस्तर पाहणी करून आढावा घेतला. या संदर्भातला सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यावेळी नाटे सरपंच संदीप बांदकर, ग्रामपंचायत सदस्य निलेश बांदकर, शिवप्रेमी शरद घरकर, साखरी नाटे ग्रामपंचायत सदस्य मजीद सायेकर, पिंट्या कोठारकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळा कुबडे, संतोष चव्हाण, देवेंद्र बांदकर, प्रसाद मोदी, सुवर्णा बांदकर, मनाली करंजवकर, सचिन बांदकर, सिद्धेश मराठे आदी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, शिवप्रेमी उपस्थित होते.