
रत्नागिरी: तालुक्यातील निवळी बौद्धवाडी येथे सार्वजनिक रस्त्यावर चिरे लावून रस्ता अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवळी बावनदी, बौद्धवाडी येथील राहुल रमेश सावंत (वय ३२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ५ जून रोजी रात्री १० ते ६ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. जिल्हा परिषद शाळा निवळी पूल ते निवळी बौद्धवाडीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर, निवळकरवाडीतील सुरेश हरी निवळकर यांच्या घरासमोरील कंपाऊंडजवळ अज्ञात व्यक्तीने चिरे लावून रस्ता बंद केला. फिर्यादीच्या वाडीतील विवेक दीपक सावंत हे नोकरीनिमित्त रत्नागिरीला रिक्षाने जात असताना, त्यांना रस्ता बंद असल्याने अडचणींचा सामना करावा लागला.
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी ६ जून रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. सार्वजनिक रस्ता अडवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.