
मुंबई- उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब सोमवारी सकाळी ११ वाजता विधान भवन सचिव राजेंद्र भागवत यांची भेट घेणार आहेत. १६ आमदारांच्या निलंबना संदर्भात ते आज सचिव राजेंद्र भागवत यांची भेट घेणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गट आता अधिकच आक्रमक पणे आपली बाजू लावून धरणार असल्याचे अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वीच बोलून दाखवले होते. त्याप्रमाणे १६ आमदारांच्या निलंबनाची मागणी घेऊन परब हे आपल्या पुढील कारवाईसाठी विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांची सोमवारी भेट घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अपात्र आमदारांसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन अनिल परब सचिवांना देणार असल्याचे बोलले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाला….
सर्वोच्च न्यायालयाने,११ मे रोजी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा दिला. विधानसभा अध्यक्ष, तत्कालीन राज्यपाल यांच्यावर ताशेरे ओढत, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा ठाकरेंचे सरकार आले असते, असे महत्त्वाचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवत निकाल दिला. तसेच यावेळी १६ आमदारांच्या अपात्रेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले.