ठाणे: कल्याण-डोंबिवली ही दोन्ही शहरे अतिशय दाटी-वाटीची लोक-वस्तीची शहरे आहेत. याठिकाणी लोकांप्रमाणेच वाहनांची संख्याही लक्षणीय आहे. त्यातच पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे अद्यापही पूर्णपणे भरण्यात आलेले नसल्याने धुळीचा त्रास अद्यापही कायमच आहे. एकीकडे धुळीचा त्रास, तर दुसरीकडे वाहनांचा धूर याचा परिणाम थेट हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे. यात कल्याणमध्ये २०२ तर डोंबिवली परिसरात AQI ची पातळी २५० वर पोहोचली आहे.अशी मोजली जाते पातळीहवेच्या गुणवत्तेची पातळी ही हवेतील धूलिकण आणि इतर घातक घटकांचे प्रमाण किती आहे, त्यावरून ठरवली जाते. यासाठी पार्टिक्युलेट मॅटर हे प्रमाण असते. यात पीए १० (पार्टिक्युलेट मॅटर) आणि PM २.५ हे दोन घटक असतात. यात पीएम १० म्हणजे १० मायक्रो मीटरपेक्षा सूक्ष्म कण आणि PM २.५ म्हणजे अडीच मायक्रो मीटरपेक्षा छोटे असे अतिसूक्ष्म कण याचा समावेश असतो.
कल्याण-डोंबिवलीतील हवेची गुणवत्ता खालावली असून एक्यूआय इंडेक्सने (हवेची गुणवत्ता) २०० ची पातळी ओलांडल्याचे दिसत आहे. त्यामुळे दमा किंवा श्वसनाशी संबंधित आजार असणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.
वायू प्रदूषणामुळे सर्दी, खोकला, दम्याचे त्रास अशा आजारांचे रुग्ण वाढले आहेत. त्यासाठी मास्क वापरणे हा कायमस्वरूपी उपाय नसला तरी मास्कमुळे काही प्रमाणात हे धूलिकण आपल्या शरीरात जाण्यास मज्जाव होतो.