
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील लोटेनजीक रस्त्याने चालत जात असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत प्रवीण पांडुरंग साळवी (४७, रा. हनुमाननगर, गुणदे-खेड) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी रात्री १०.२५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या अपघातात नीरज ईश्वरदिन वर्मा (२९) हा दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला. अपघातामुळे काही काळ वाहतूक थबकली.
प्रवीण साळवी हे लोटे येथील एच. पी. पेट्रोलपंप ते लोटेमाळ जाणाऱ्या सर्व्हिस रोडने लोटे बाजूने पायी जात होते. याचवेळी नीरज ‘वर्मा हा एम.एच.०८/ए.झेड. ८७६० या दुचाकीने वेगाने जात होता. त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवानाही नव्हता. रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बेदकारपणे दुचाकी चालवून पादचाऱ्याला पाठीमागून धडक दिली. या अपघातात प्रवीण साळवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापती झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच चिपळूण वाहतूक पोलीस मदतकेंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अनंत पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामपूरकर, पोलीस कॉन्स्टेबल राठोड, नार्वेकर, निवडुंगे, लोटे पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील व सहकारी घटनास्थळी पोहचले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारास लवेल येथील घरडा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार नीरज वर्मा याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*.. अन् नियतीने तरुणांवर झडप घातली..*
प्रवीण साळवी हे लोटे येथील पेट्रोलपंपावर कारमध्ये सीएनजी भरण्यासाठी गेले होते. सीएनजीच्या तुटवड्यामुळे ते कार तिथेच उभी करून नजीकच्या टपरीवर गेले होते. परतत असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने धडक देत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाच्या कर्त्याकरवित्यावरच नियतीने झडप घातल्याने साळवी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.