
खेड तालुक्यातील चिरणी गावचे सुपुत्र असलेले मोहन मनोहर आंब्रे शिवसेनेचे जुने जाणते कार्यकर्ते होते. चिरणी गावातील ते एक प्रमुख कार्यकर्ते होते.
रत्नागिरी : रत्नागिरीत झालेल्या भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शिवसेना कार्यकर्ते आणि खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती Mohan Ambre Death In Accident झाले. खेड तालुक्यात चिरणी येथे झालेल्या अपघातात आंब्रे गंभीर जखमी झाले होते, मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
चिरणी येथे त्यांच्या घराचे काम सुरु आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारच्या सुमारास ते चिरणी येथून लोटे येथे आपल्या बुलेटवरुन निघाले होते. यावेळी चिरणी ब्रिजवर समोरुन येत असलेल्या बाईकशी धडक होऊन त्यांचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.
अपघातात आंब्रे बाईकवरुन फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा अपघात झाल्याचं समजताच त्यांना तातडीने चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आलं होतं. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना अधिक उपचाराकरीता कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं होते. मात्र याच दरम्यान मंगळवारी मध्यरात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
खेड तालुक्यातील चिरणी गावचे सुपुत्र असलेले मोहन आंब्रे शिवसेनेचे जुने जाणते कार्यकर्ते होते. चिरणी गावातील ते एक प्रमुख कार्यकर्ते होते. खेड तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती, शिवसेना माजी तालुकाप्रमुख अशा अनेक मोठ्या पदांवर त्यांनी संघटनेत काम केलं आहे. मोहन आंब्रे यांचा परिसरात व खेड तालुक्यात मोठा संपर्क होता. त्यांच्या मृत्यूने खेड तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आर्मीतून निवृत्त असलेले सख्खे भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.
मोहन आंब्रे यांच्या निधनाने विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्षांकडूनही शोक व्यक्त करण्यात आला आहे. मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर यांनी आम्ही आमचा चांगला सहकारी गमावला अशा शब्दात शोकभावना व्यक्त केली आहे.
त्यांचा अंत्यविधी आज बुधवारी 18 जून रोजी दुपारी एक वाजता खेड तालुक्यात त्यांच्या चिरणी या मूळगावी होणार आहे अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.