
*चिपळूण :* तालुक्यातील नागावे नदीपात्रालगत असलेल्या प्लास्टिक साठ्याला लागलेल्या आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाली. शनिवारी सायंकाळी ४ वाजता घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आत काम करत असलेल्या सहा कामगारांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडून आपला जीव वाचवला.सदर इमारतीलगत वाढलेले गवत शेतीकामासाठी जाळण्यात आले होते. कडक उन्हामुळे ही आग वेगाने पसरत प्लास्टिक साठ्यापर्यंत पोहोचली. प्लास्टिकचा मोठा साठा असल्याने आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले. या ठिकाणी भंगार प्लास्टिक पिशव्या धुवून व साकवून कच्चा माल तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आग लागल्यानंतर सुरुवातीचा अर्धा तास उलटूनही अग्निशमन दल किंवा पोलिस यंत्रणा घटनास्थळी वेळेत पोहोचली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात उशीर झाला. कामगारांच्या माहितीनुसार, घटनास्थळी सुमारे तीन ट्रक इतका प्लास्टिक साठा होता, ज्यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली.महाजनको पोफळी येथून अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, त्यांच्या वाहनातील पाणीसाठा अपुरा पडत असल्याने आग विझवण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले. अतिरिक्त पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली. या आगीत संपूर्ण इमारत भस्मसात झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*