
रत्नागिरी: रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनाऱ्यावर मागील ४० वर्षांमध्ये प्रथमच चायना शिंपल्यांचा मोठा “समुद्री खजिना” सापडला आहे. हा खजिना लुटण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. नागरिक मिळेल ते साहित्य घेऊन भाट्ये किनारी धाव घेत आहेत. सलग दोन दिवस शिंपले मिळाल्याने रत्नागिरीतील खवय्यांची चांगलीच चंगळ उडाली आहे.
रत्नागिरी भाट्ये येथे दोन दिवसांपूर्वी एका मच्छिमाराच्या पायाला हे घबाड लागल्याने अवघ्या काही तासांतच भाट्ये किनाऱ्यावर शिंपले (मुळे) गोळा करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी समुद्र किनारी धाव घेतली. त्यात बघ्यांची गर्दी इतकी वाढली की, भाट्ये पुलावरही वाहतूक मोठी कोंडी झाली. शेवटी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.
कोकणात या शिंपल्यांना मुळे किंवा शिंपले म्हणतात. प्रामुख्याने तिसरे आणि धामणे अशा दोन जाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. कोकणातील मत्स्यप्रेमी खवय्ये तिसरे मुळे मोठ्या आवडीने खातात आणि त्यांना खवय्यांची मोठी पसंती असते. मात्र, सध्या भाट्ये किनाऱ्यावर सापडत असलेली मुळ्यांची जात थोडी वेगळी आहे. याला “चायना मुळा” असे स्थानिक नाव देण्यात आले आहे.
या चायना मुळ्यांचे घबाड भाट्ये किनाऱ्यावर सापडल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या उत्साहात हे मुळे गोळा करत आहेत. ही दुर्मिळ घटना अनुभवण्यासाठी आणि या अनोख्या समुद्री खजिन्याचा लाभ घेण्यासाठी भाट्ये समुद्र किनाऱ्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे. मंगळवारी तर भाट्ये समुद्र किनारा मुळ्ये गोळा करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनी अक्षरश फुलून गेला होता. एक – एक जण मोठ मोठ्या पोतल्या भरून भरून हा समुद्री खजिना घेऊन जात होते.