
रत्नागिरी :दि २९ मार्च- निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील दोन सदस्य समुद्रात बुडाले असून, त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाला स्थानिकांच्या तत्परतेमुळे वाचवण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर आणि विरार परिसरातील एक कुटुंब रविवारी सकाळी आरे-वारे समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास समुद्रात उतरलेल्या संतोष शशिकांत भानुशाली आणि सुयोग राजेश भानुशाली यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ओहोटीच्या प्रवाहाने आत ओढले. त्यामुळे दोघेही बुडू लागले.
यावेळी किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी तसेच पोलीस पाटील आदेश कदम यांनी तात्काळ समुद्रात धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुयोग राजेश भानुशाली (वय २१, रा. विरार) याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
मात्र, संतोष शशिकांत भानुशाली (रा. पालघर) यांचा या घटनेत मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे भानुशाली कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*