
चिपळूण- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय वातावरण तापू लागले असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, दि. २८ जानेवारी रोजी चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. बहादूरशेख नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर होणारी ही भव्य जाहीर सभा रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव सभा असल्याने, या सभेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे शिवसेना–भाजप युतीच्या प्रचाराला नवे बळ मिळणार असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सभेकडे लागून राहिले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेना–भाजप युतीने जोरदार प्रचार सुरू ठेवला असून, प्रचाराच्या रणधुमाळीत आता मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरल्याने राजकीय समीकरणांना वेगळी धार मिळाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात होणारी ही एकमेव जाहीर सभा असल्याने भाजप नेते प्रशांत यादव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सभेच्या यशस्वीतेसाठी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागले आहेत. जिल्हाभरातून कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यादृष्टीने तयारीला वेग आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जाहीर सभेत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विकास योजनांचा आढावा घेणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम आणि स्थिर नेतृत्वाची गरज अधोरेखित करणार असल्याचे सांगितले जात आहे. ‘डबल इंजिन सरकार’मुळे राज्यातील तसेच कोकणातील विकासाला मिळालेल्या गतीचा उल्लेख करत ते मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत. या सभेमुळे युतीच्या उमेदवारांना बळ मिळणार असून, निवडणूक प्रचाराला निर्णायक दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपचे पदाधिकारी, नगर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानाची संयुक्त पाहणी केली. सभास्थळाची मांडणी, सुरक्षा व्यवस्था, वाहनतळ, वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून दक्षतेचे सर्व निकष पाळले जात असून, शांततापूर्ण वातावरणात सभा पार पडावी यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या जाहीर सभेमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळणार असून, चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*