
नागपूरला तकडकाफडकी बदली : वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचीही बदली होण्याची शक्यता..
*ठाणे :* मीरा भाईंदर मध्ये झालेल्या मराठी स्वाभिमान मोर्चाला पोलीस परवानगी नाकारल्याने मराठी माणसाचा आक्रोश रस्त्यावर दिसून आला. या आक्रोशाला पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त मधुकर पाण्डे यांची उचलबांगडी केली. आज पुन्हा पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची नागपूरला तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांना मोर्चा काढून दिल्यानंतर मराठी एकीकरण समितीला मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे ८ जुलैला मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसांसह मनसे, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि मराठी संघटनांनी मोर्चा काढला.
मोर्चाला परवानगी नाकारणं भोवलं, मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची तडकाफडकी बदली…
हे प्रकरण पोलिसांच्या असहकाराच्या भूमिकेमुळे चिघळले आणि मराठी जनसमुदाय रस्त्यावर उतरला. त्याचा फटका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देखील बसला. त्यानंतर मंत्री सरनाईक यांनी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारून चूक केल्याच्या गंभीर आरोप करीत मुख्यमंत्र्याकडे पोलिस उपायुक्त गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी केल्यानंतर मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने उचलबांगडी केली. मात्र उपायुक्त गायकवाड यांच्यावर कारवाई झाली नव्हती. अखेर आज उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची बदली नागपूर येथील राज्य गुप्त विभागात केली आहे. याप्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली होण्याची शक्यता आहे.