सेल्फीचा मोह की आत्महत्या ? कारण अस्पष्ट!, रत्नागिरीच्या भगवती किल्ल्यावरून तरुणी समुद्रात कोसळून बेपत्ता सस्पेन्स कायम…

Spread the love

*रत्नागिरी :*  शहरातील प्रसिद्ध भगवती किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉटजवळ आज (रविवार, २९ जून) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात तरुणी खवळलेल्या समुद्रात कोसळून बेपत्ता झाली आहे. ही घटना सेल्फी काढताना पाय घसरल्यामुळे घडली, की तिने समुद्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

घटनेचे तपशील आणि शोधमोहीम
रविवारी सुट्टी असल्यामुळे भगवती किल्ल्याजवळील शिवसृष्टी पाहण्यासाठी स्थानिक आणि बाहेरून आलेल्या पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यावेळी २३ ते २५ वयोगटातील एक तरुणी पाणभुयार स्पॉटजवळील रेलिंगच्या पुढे जाऊन सेल्फी काढण्यात मग्न होती, असे समजते. सेल्फी काढताना तिने आपली चप्पल आणि स्कार्फ बाजूला काढून ठेवले होते. तिच्या आजूबाजूला इतर पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असताना, काही क्षणात ती तरुणी अचानक सुमारे २०० ते २५० फूट खोल समुद्राच्या पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले.
तरुणीला पाण्यात पडताना पाहून आजूबाजूच्या पर्यटकांनी आरडाओरडा सुरू केला, ज्यामुळे घटनास्थळी एकच गर्दी झाली. काही पर्यटकांनी तात्काळ शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत ती तरुणी खवळलेल्या समुद्रात दिसेनाशी झाली होती.

मदतकार्य आणि पुढील तपास
घटनेची माहिती मिळताच, सायंकाळपर्यंत रत्नदुर्ग माऊंटेनियर्स आणि चिपळूणहून आलेले एनडीआरएफचे पथक फिशरीजच्या दोन ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने समुद्रात बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध घेत होते. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.
या घटनेमुळे भगवती किल्ल्याच्या परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यटकांनी अशा धोकादायक ठिकाणी अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page