
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक प्रतिनिधींचा सहभाग असलेली एक समिती गठीत करण्याच्या सुचना…
राजापूर (प्रतिनिधी): ऐतिहासिक वारसा आणि ठेवा असलेल्या नाटे येथील घेरा यशवंतगड किल्ल्याच्या डागडुजी आणि दुरुस्तीचे काम हे अत्यंत दर्जेदार असेच होईल व केले जाईल. स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी यांनी माडंलेल्या सुचना आणि सुचविलेले बदल याप्रमाणेच हे काम केले जाणार आहे. या कामाचा दर्जा आणि कामाची पुर्तता ठरल्या प्रमाणे व्हावी यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक प्रतिनिधींचा सहभाग असलेली एक समिती गठीत करून हे काम पुर्ण केली जाईल अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली.
या कामात कोणीही कोणतेही राजकारण करू नये असे आवाहन करताना हे काम चांगल्या पध्दतीने मार्गी लावणे हा प्रामाणिक हेतु ठेऊन प्रत्येकाने यासाठी सहकार्य केले पाहिजे, किल्ल्याच्या कोसळलेल्या भिंतीचे काम सोमवार पासुन सुरू केले जाईल तर उर्वरित काम हे ऑगस्ट नंतर सुरू होईल. या कामात कोणताही हलगर्जीपणा आपण खपवून घेणार नाही असेही आ. सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
नाटे येथील पुरातन व ऐतिहासिक वारसा असलेल्या घेरा यशवंत गडाच्या डागजुगी व दुरूस्तीचे काम शासनाच्या पुरातत्व विभागाकडून सुरू आहे. मात्र हे काम सुरू असतानाच यावर्षीच्या पहिल्याच पावसात या किल्ल्याची नव्याने बांधलेली संरक्षण भिंतच ढासळली. त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले व शिवप्रेमींसह स्थानिकांतुन याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर अनेकांनी या किल्ल्याला भेट देत या कामाची पहाणी करत याबाबत प्रशासनाला निवेदन दिले.
या पार्श्वभूमिवर आ. सामंत यांनी रविवारी या किल्ल्याला भेट दिली. याप्रसंगी तहसीलदार विकास गंबरे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विकास वहाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्याकारी अभियंता अनिल ओटवणेकर, मे. साईप्रेम कंट्रक्शन लातूरचे ठेकेदार मुकेश जाधव आदींसह स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी उपस्थित होते.
याप्रसंगी आ. सामंत यांनी या किल्ल्याच्या कोसळलेल्या भिंतीची पहाणी केली. सदरची भिंत पुन्हा कशा पध्दतीने उभारता येईल याबाबत चर्चा केली. त्यानंतर आ. सामंत यांनी या अधिकाऱ्यांसह किल्ल्याच्या आतील परिसराची पहाणी केली. यावेळी उपस्थित स्थानिक ग्रामस्थ व शिवप्रेमींनी किल्ल्याचे दुरूस्ती व डागजुगीचे काम योग्य पध्दतीने केले जात नसल्याच्या तक्रारी केल्या. नाटे सरपंच संदीप बांदकर, रमेश लांजेकर, संतोष चव्हाण, मनोज आडविलकर, मलिक गडकरी, विनायक कदम, अजित नारकर आदींनी आपली मते मांडली. काम करणारी प्रशासकिय यंत्रणा व ठेकेदाराकडून स्थानिकांना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी केल्या. तर या कामासाठी वापरण्यात आलेले चिरे, वाळु व अन्य साहित्य निकृष्ठ दर्जाचे असल्याचेही सांगण्यात आले. ठेकेदाराच्या मनामानी विरोधात यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.
यावर आ. किरण सामंत यांनी अधिकारी व ठेकेदार यांना चांगलेच धारेवर धरले. हे काम स्थानिकांना विश्वासात घेऊनच झाले पाहिजे अशा सुचना दिल्या. आपल्याला हे काम चांगल्या पध्दतीने करावयाचे असून त्यासाठी आता आपण यापुढे नियोजन करूया असे आ. सामंत यांनी नमुद केले. यासाठी तहसीलदार विकास गंबरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेत या समितीत या भागातील स्थानिक पाच प्रतिनिधींचा समावेश करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांना माहिती देऊन काम करावे अशा सुचना दिल्या. तर या किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलेला दगड हा निकृष्ठ दर्जाचा असून यापुढे स्थानिक ग्रामस्थ व शिवप्रेमी यांनी सुचित केलेला त्या साईजचा दगड बांधकामासाठी वापरावा अशा सुचना केल्या. यासाठी स्थानिक चिरेखाण संघटनांशी चर्चा करून तसा दगड त्यांच्याकडून तयार करून घ्यावा असेही आदेश आ. सामंत यांनी ठेकेदाराला दिले. तर वाळू सह अन्य साहित्यही दर्जेदारच वापरले पाहिजे कोणतीही तक्रार खपवून घेणार नाही असे आ. सामंत यांनी सांगितले.
तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठ दिवसात समिती गठीत करून या समितीची नियमित बैठक होऊन या कामाचा आढावा घेईल असेही नमुद केले. या कामासाठी शासनाकडून आठ कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला असून आत्तापर्यंत एक कोटीचे काम झाल्याची माहिती यावेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी डॉ. वहाणे यांनी दिली. या पुढील कामेही योग्य पध्दतीने केली जातील असेही त्यांनी नमुद केले.
याप्रसंगी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुका प्रमुख दीपक नागले, जिल्हा बँक संचालक महेश उर्फ मुन्ना खामकर, भाजपा जिल्हासरचिटणीस रवींद्र नागरेकर, राजापुरचे माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, दीपक बेंद्रे, तसेच सरफराज काझी, जितेंद्र खामकर आदींसह नाटे, साखरीनाटे भागातील स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.