
झाडे हटविण्याबाबत प्रशासन ढीम्म: दुर्घटना घडल्यास जबादार कोण?
राजापूर / प्रतिनिधी – राजापूर तालुका पंचायत समितच्या आवारात असलेली झाडे जीर्ण झाली असुन वादळी वारा व पावसात ती कधीही मोडून पडण्याच्या अवस्थेत आहेत. सदरची झाडे तोडावीत अशी वारंवार मागणी करूनी पंचायत समिती प्रशासनाकडून मात्र त्याकडे डोळेझाक केली जात आहे. मात्र कायमच गजबजलेल्या पंचायत समितीच्या आवारातील ही झाडे मोडून पडून गंभीर दुर्घटना घडली तर त्याला जबबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात असून याबाबत राजापूर तहसीलदार यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
तालुका पंचायत समितीच्या आवारात प्रवेशद्वावरच असेलेली जुनी दोन ते तीन झाडे ही जीर्ण झाली आहेत. त्यांच्या फांद्या पुर्णपणे कोरमल्या असून वादळी वारा व पाऊस झाला की झाडे देखील हेलकावे खात आहेत. या ठिकाणची ही धोकादायक झाडे तोडावीत अशी येणाऱ्या जनतेची मागणी आहे. या झाडाखालीच मोठया प्रमाणावर दुचाकी व चारचाकी वाहनेही लावली जातात. जर का वादळी वाऱ्यात यातील एखादे झाड कोसळले तर मोठी दुर्घटना घडू शकते. ही झाडे तोडावीत अशी मागणी करूनही पंचायत समित प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
या झाडांच्या बदल्यात आवारात नवीन झाडे लावून वृक्ष संवर्धन करता येणे शक्य आहे. मात्र प्रशासनाची तशी मानसिकता दिसत नाही. अशा प्रकारे ही झाडे मोडून पडून एखाद्या दुर्घटनेची प्रशासन वाट पहातेय काय?असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी तहसीलदारांनी गांभीर्याने लक्ष घालावे व ही धोकादायक झाडे हटविण्याबाबत संबधित प्रशासन वा वनविभागाला आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे.