
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये थेट महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार, अशा शब्दात सूचक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उत्सुकता वाढली आहे. यातच ‘दैनिक सामना’मध्ये देखील याबाबत सकारात्मक बातमी आल्याने याबाबतची चर्चा अधिकच रंगली आहे.
शिवसेना पक्षातून बाहेर पडत राज ठाकरे यांनी 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. तेव्हापासून हे दोघे भाऊ एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. मात्र, आता बदलत्या राजकीय परिस्थितीत मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे आता या सर्व घटना घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही गोंधळ नाही – उद्धव ठाकरे
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सोबत युती करण्याचे संकेत दिले. युतीच्या नव्या अटकळी दरम्यान, उद्धव म्हणाले की महाराष्ट्रातील लोकांना जे हवे आहे ते होईल. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष आणि मनसेमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू आहे का, हा प्रश्न त्यांनी टाळला. ते म्हणाले की युती बाबत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही गोंधळ नाही.
दोन्ही पक्षांमधील युती बद्दल बरीच चर्चा
राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेनेपासून वेगळे झाल्यानंतर मनसेची स्थापना केली होती. या वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर महिन्यात महाराष्ट्रात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (यूबीटी) आणि मनसेच्या खराब कामगिरीमुळे, दोन्ही पक्षांमधील युती बद्दल बरीच चर्चा आहे. 2024 च्या निवडणुकीत उद्धव यांच्या पक्षाला फक्त 20 जागा मिळाल्या असताना, मनसेचे खातेही उघडले गेले नाही.
सामना मधील बातमी देखील वाचा…..
शिवसेना आणि मनसे युती बाबत रोज बातम्या येत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज यावर थेटच बोलले. ‘महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार,’ असे स्पष्ट शब्दांत सांगताना ‘संदेश देणार नाही, मी बातमीच देतो’ असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे शिवसेना-मनसे यांच्यात सूर जुळणार, असे संकेत मिळाले असून अवघ्या महाराष्ट्राची उत्सुकता ताणली गेली आहे.
चर्चा सुरू आहे का, असे पत्रकारांनी विचारताच, मी एका वाक्यात तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यातले बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.
उद्धव ठाकरे-राज ठाकरे कधी एकत्र येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. साद दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे; पण शिवसेनेने अधिकृत प्रस्ताव पाठवावा मग पाहू, असे मनसे म्हणत आहे, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय, असे पत्रकारांनी विचारले असता, ‘ठीक आहे बघू ना… जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले आणि टाळय़ांचा कडकडाट झाला.
शिवसैनिक–मनसैनिक संपर्कात, कुठेही संभ्रम नाही…
तुम्ही कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल, असा प्रश्न येताच संदेश कशाला मी बातमीच देतो तुम्हाला, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सूर जुळत असल्याचे संकेत दिले. माझ्या शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही. त्यांचे सैनिक आणि माझे शिवसैनिक एकमेकांच्या संपका&त आहेत. त्यांच्याही मनात संभ्रम नाही. त्यामुळेच संदेश वगैरे देण्यापेक्षा माझं स्पष्ट म्हणणं आहे की, जी काही बातमी द्यायची आहे ती बातमी आम्ही देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले.
राज ठाकरे यांनी घेतली बैठक…
महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांचीदेखील अशीच भावना आहे. या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी तातडीची बैठक घेत मनसे पदाधिकाऱयांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये एकत्र येण्याबाबत सकारात्मक बोलणं असेल तर चांगली गोष्ट आहे, महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅण्ड टिकला पाहिजे, अशी भूमिका पदाधिकाऱयांनी मांडली.