
रत्नागिरी जिल्ह्यातील अणुस्कुरा घाट मार्गावर बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. घाट परिसरात धुके आणि पाऊस असल्याने मदतकार्यात अडथळे आले. प्रवासीकार थेट दरीत कोसळली आहे….
रत्नागिरी : पावसाळ्यात कोकणातून घाट मार्गे प्रवास करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक असत. घाट रस्त्यातून प्रवास करताना मोठी काळजी घ्यावी लागते. अशातच कोकणातील पश्चिम महाराष्ट्रावरून येणारे काही घाटमार्ग सध्या पावसाळ्यात धोकादायक झाले आहेत. अणूस्कुरा घाट मार्गही गेले काही दिवस धोकादायक झाला आहे. याच घाटात बुधवारी मध्यरात्रीनंतर किंवा पहाटेच्या दरम्यान एक भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीही याच घाटात अनेक अपघात झाले आहेत. गेल्या काही दिवसात या घाटात दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या होत्या त्यामुळे वाहतूकही थांबवण्याची वेळ आली होती.
अणूस्कुरा घाटात ईरटीका कारचा अपघात झाला आहे. ही प्रवासीकार थेट दरीत कोसळली आहे, मात्र हा अपघात मध्यरात्री उशिरा किंवा पहाटेच्या दरम्यान झालेला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. घाट परिसरात असलेले मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर व रिमझिम पाऊस यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.
मागील काही महिने वाहतूकिसाठी धोकादायक बनलेल्या अणूस्कुरा घाटात पुन्हा एकदा आज बुधवारी मोठा अपघात झाला आहे. एक ईरटीका कार सुमारे शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे राजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मयत व्यक्तीची ओळख समजू शकलेली नाही. कोल्हापूरकडून पाचल कडे येत असताना हा अपघात झाला आहे. राजापूर तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल आहेत.
दरम्यान घाट मार्गात वारंवार दरड कोसळणे ,अपघात होणे असे प्रकार घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून घाट मार्गात मदत केंद्र कक्ष अथवा फिरते मदत पथक स्थापन करावा अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.