“नेहरूंनी चूक केली असं मानूया, मग तुम्ही…”, काँग्रेसचा मोदी-शाहांना टोला; म्हणाले, “POK मधून सफरचंद तरी आणून दाखवा…”

Spread the love

नवी दिल्ली : अधीर रंजन चौधरी म्हणाले, पाकव्याप्त काश्मीरबाबत संसदेत एक अख्खा दिवस चर्चा व्हायला हवी. कारण हा काही छोटा वाद नाही. देशातल्या जनतेला या वादाचं गांभीर्य आणि खोली माहिती असायला हवी. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह पाकव्याप्त काश्मीर हिसकावून घेण्याच्या घोषणा करत आहेत. अमित शाह जसं म्हणतायत त्याप्रमाणे आपण असं मानूया की, नेहरूंनी चूक केली होती. अमित शाह गेल्या दशकभरापासून तीच तक्रार करत आहेत. २०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यात आलं तेव्हा लोकसभेत अमित शाह म्हणाले होते, पीओके, सियाचीन हा सर्व काश्मीरचा भाग आहे. तसेच अमित शाह हा भाग परत मिळवण्याचा दावा करत होते. यांच्या सरकारला आता १० वर्ष होत आली आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांचं सहा वर्षे सरकार होतं. या १६ वर्षांमध्ये पाकव्याप्त काश्मीर घेण्यापासून तुम्हाला कोणी अडवलं होतं? या देशात दोन पराक्रमी नेते आहेत. एक मोदी आणि दुसरे शाह, या दोघांना पाकव्याप्त काश्मीर घेण्यापासून कोणी रोखलंय?

खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले, पाकव्याप्त काश्मीरचं राहूद्या, किमान तिथून एक सफरचंद तरी आणून दाखवा. पाकव्याप्त काश्मीरमधून चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर बनवला जातोय. यावर मोदी आणि शाह का गप्प बसले आहेत? तुम्ही जी-७, जी-२०, शांघाय परिषदांना जाता, मग तिथे जाऊन पीओकेसाठी प्रयत्न का करत नाही. पाकव्याप्त काश्मीर घेऊन दाखवा. काँग्रेसला जमलं नाही ते काम तुम्ही करून दाखवा, एखादं सफरचंद आणून दाखवा. तेवढं केलं तरी तो तुमचा मोठा पराक्रम असेल. लडाखमध्ये अतिक्रमण झालंय. गलवान खोऱ्यातल्या घटना सर्वांना माहिती आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page