
राज्यात तब्बल 1 लाख 11 हजार कोटींची परकीय गुंतवणूक
अलिबाग,:- हे सरकार गतिमान निर्णय घेणारे सरकार असून या सरकारने उद्योग क्षेत्रात गेल्या 10 महिन्यातच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पनवेल येथे केले.
पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित “पुढारी सन्मान सोहळा 2023” प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, प्रसिद्ध उद्योजक जे.एम.म्हात्रे, पुढारी चे निवासी संपादक शशिकांत सावंत, पुढारी वृत्तपत्राचे मार्केटिंग हेड अमित तळेकर, रायगड जिल्हा ब्युरो चिफ जयंत धुळप हे मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले की, गेल्या दहा महिन्यांमध्ये या सरकारने महाराष्ट्रात 29 टक्के म्हणजेच जवळपास एक लाख अकरा हजार कोटी परकीय गुंतवणूक आणण्यात यश मिळविले आहे. तसेच “दैनिक पुढारी” हे वृत्तपत्रांमधील खरे “पुढारी” असून त्यांचे वृत्तपत्र क्षेत्रातील काम हे नेहमीच वाखाणण्याजोगे राहिले आहे.
सर्व सत्कारार्थीचे कौतुक करताना पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले की, सत्कार करून घेणे आणि सत्कार होणे यात मोठा फरक आहे. पुढारी वृत्तसमूहाचे याबाबतीत मनःपूर्वक धन्यवाद की, त्यांनी अत्यंत योग्य अशा कर्तृत्ववान व्यक्तींची सत्कारार्थी म्हणून निवड केली आहे. त्यातही त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवन गौरव पुरस्काराने झालेला सन्मान निश्चितच या सोहळ्याची उंची वाढविणारा आहे.
या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, पनवेल तालुका गटविकास अधिकारी संजय भोई या प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. याबद्दल बोलताना श्री.सामंत म्हणाले की, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकांसाठी काम करण्याची भावना ठेवणे आवश्यक आहे. अधिकाऱ्याने प्रामाणिकपणाने काम करणे महत्त्वाचे आहे. सत्कारार्थींनी त्यांना मिळालेल्या सत्कारामुळे त्यांची जबाबदारी वाढली असून पुढची संस्कारक्षम पिढी घडविणे, ही सुद्धा आपली जबाबदारी असल्याचे समजून घ्यायला हवे.
आपल्या भाषणात पालकमंत्री उदय सामंत यांनी दैनिक पुढारीचे कौतुक करताना सांगितले की, हे वृत्तपत्र कधीही कुठलाही आकस न ठेवता काम करणारे वृत्तपत्र आहे. पुढारी वृत्तसमूहाने तसेच प्रतापराव जाधव व त्यांच्या कुटुंबियांनी राजकारण, समाजकारण यामध्ये भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या नावाने कोल्हापूर विद्यापीठात अध्यासन सुरू करण्याचे भाग्य मला लाभले असल्याचेही ते म्हणाले.
या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित “सफरचंद” या नाटकाच्या सर्व कलावंतांचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.