
भाजपने जनसंपर्क अभियान राबवण्याचा घेतला निर्णय
मोदी सरकारला सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. यामुळे आता मोदी सरकारने आणि विशेषतः भाजपने जनसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 15 मे ते 15 जून असे महिन्याभराचे हे जनसंपर्क अभियान असणार असून महाराष्ट्रात देखील भाजपच्या वतीने हे अभियान राबवले जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज’ योजना आणली आहे. या योजनेंतर्गत 12 नंतर पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 5 लाखांपर्यंत विनातारण कर्ज मिळू शकतो. 5 लाखांपर्यंतच्या कर्जावर 0 टक्के व्याजदर आहे. विद्यार्थ्याला 15 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.
राज्यासह देशभरात उन्हाचा तडाखा वाढणार, हवामान विभागाचा इशारा
राज्यासह देशामध्ये वाढत असलेल्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असतानाच पुढील दोन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. देशातील अनेक राज्यात तापमान 45 अंशावर गेले आहे. आज देशातील अनेक राज्यात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.
टोमॅटोला भाव न मिळाल्याने शेतकरी संतप्त
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटोला भाव नसल्याने बाजार समितीच्या रस्त्यावर टमाटे टाकून दिले. शेतकऱ्यांनी आणलेल्या टोमॅटोला 2 ते 3 रुपये किलो भाव मिळाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नाईलाजाने टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. टोमॅटो बाजार समितीपर्यंत आणण्यासाठी लागलेला खर्च निघाला नाही तसेच टोमॅटो परत घेऊन जाण्यासाठी खर्च लागला असता म्हणून शेतकऱ्यांनी टोमॅटो टाकून देत सरकारचा निषेध केला.
आरसीबीच्या विजयाने मुंबईचे टेन्शन वाढले
आरसीबीने काल हैदराबादवर विजय मिळवला. या विजयाने पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावरील मुंबईला पाचव्या स्थानी फेकत आरसीबीने चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. इथून पूढे सर्वच संघाचे एक-एक सामने राहिले आहेत. प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चेन्नई, लखनऊ, आरसीबी, मुंबई व राजस्थान या संघांना फक्त विजयच मिळवून चालणार नाही. तर रनरेटही वाढवावा लागणार आहे. मात्र मुंबईचा रनरेट मायनसमध्ये असल्याने टेन्शन वाढले आहे.