रत्नागिरीतील ९२ कोटीच्या प्रशासकीय भवनाला शासनाची मान्यता..

Spread the love

‘रत्नागिरीचा सन्मान हाच आमचा अभिमान’ रत्नागिरीकर आणि प्रशासनाचे जोरदार काम

-पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी:- राज्यातील प्रथम क्रमांकाचे ९२ कोटी खर्चाचे प्रशासकीय भवन रत्नागिरीमध्ये उभारले जाणार आहे. राज्य शासनाची त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ‘रत्नागिरीचा सन्मान हाच आमचा अभिमान’, हे स्लोगन घेऊन रत्नागिरीकर आणि प्रशासन जोरदार काम करत आहे, असे उद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डाॕ गणेश मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सर्वप्रथम उपस्थितीत स्वांतत्र्य सैनिक त्यांचे कुटुं‍बीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी – कर्मचारी, पत्रकार आणि जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ५०० वर्षापासून असलेली मागणी आणि भारतीयांची आस्मिता असणारे प्रभू रामचंद्राचे मंदिर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. या ऐतिहासिक आणि महत्वाच्या पूर्णतेबद्दल जिल्हावासियांच्यावतीने प्रधानमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा विकासात्मक घोडदौड करतोय.

प्रत्येकाच्या जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. जलजीवन मिशनमधून होणाऱ्या नळ पाणी योजनांसाठी ११०० कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, सिंधुरत्न ही ऐतिहासिक योजना आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी या योजनेमधून हाऊसबोट देण्यात आली आहे. महिलांनी चालविलेली हाऊसबोट येणाऱ्या पर्यटकांना पहायला मिळेल. जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी याचा निश्चित उपयोग होणार आहे. एपीजे अब्दुल कलाम जिल्ह्यातून घडले पाहिजेत. त्यासाठी गरिबांच्या मुलांना नासा आणि इस्त्रोला पाठविणारा राज्यातील पहिला जिल्हा रत्नागिरी ठरला आहे.

जिल्ह्याचा ३०० कोटींचा आराखडा असून, शासन निश्चित यावर्षी वाढवून देईल त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडेल. अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना या सर्व योजनांसाठी नियमानुसार खर्च करण्याचे नियोजन आम्ही सर्व करत आहोत. पोलीसांच्या घरांचा प्रकल्प रत्नागिरीत होत आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यांच्या वाहनांचा वा सीसीटीव्हीचा प्रश्न असो, ते सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री महोदयांशी झालेल्या चर्चेनुसार एसटीप्रमाणेच ग्रामीण भागातून येणाऱ्या सीटी बसचे तिकीटदेखील महिलांना ५० टक्क्यात मिळणार आहे. लवकरच हा निर्णय होईल. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा आहे त्यादृष्टीने प्राणी संग्रहालयाच्या कामास सुरुवात झाली आहे. देशातला पहिला थ्रीडी मल्टीमीडिया शो येथे होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यातील सर्वात उंच पुतळ्याचा लोकार्पण सोहळा ४ तारखेला होत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होण्यासाठी एकत्र काम करतोय.

सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा, यासाठी रत्नागिरीतील विमानतळ विकसित होत आहे. विमिनतळ टर्मिनल इमारतीसाठी १०० कोटी राज्याने मंजूर केले आहेत. लवकरच सर्वसामान्य माणसाच्या सेवेत हे दाखल होईल आणि त्याला विमान प्रवास करता येईल. विकासाची अनेक कामे करत असताना मंडणगड, चिपळूण, दापोली, गुहागर, संगमेश्वर असेल त्याचबरोबर अन्य ९ शहरांच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे काम शासनाने केले आहे. काजू बोर्डाचे ५ वर्षासाठी १३०० कोटी मंजूर केले आहेत. आंबा बोर्ड असावे अशी आंबा बागायतदारांची मागणी होती, त्याला तत्वता मान्यता दिली आहे. त्याचबरोबर साडेनऊ कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला असून लवकरच आंबा बागायतदारांच्या खात्यात जमा होतील.

‘निर्णय वेगवान महाराष्ट्र गतीमान’ हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र शासन विकासाकडे झेपावतेय. ‘रत्नागिरीचा सन्मान हाच आमचा अभिमान’ हे स्लोगन घेऊन जिल्ह्याची वाटचाल सुरु आहे. भविष्यातही रत्नागिरीकर आणि प्रशासन जोरदार काम करत राहील, त्यासाठी रत्नागिरीकरांना आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो.

ध्वजरोहणानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी परेड निरिक्षण केले. त्यानंतर झालेल्या संचलनात पोलीस मुख्यालय पथक, गृहरक्षक दल, पोलीस बँड पथक, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे एनसीसी आर्मी, एनसीसी नेव्हल, पटवर्धन हायस्कूलचे एनसीसी आर्मी, एनसीसी नेव्हल, ए डी नाईक ऊर्दू स्कुलचे स्काऊट गाईड पथक, जवाहर नवोदय विद्यालयाचे स्टुडंड पोलीस कॅडेट पथक, पोलीस श्वान पथक व्हिक्टर डॉगकडून मानवंदना, चित्ररथात मोबाईल फाॕरेंनसिंग इन्वेस्टींग व्हॅन, नगरपरिषदेचे अग्निशमन दल, १०८ रुग्णवाहिका, शिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व इतर उपक्रम, ढोल पथक, लेझिम पथक, महावाचन उत्सव, चांद्रयान मोहीम-जिल्हा परिषद शाळा, मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा, नवभारत साक्षरता अभियान योजना विभाग, जिल्हा परिषदेच्या गोदुताई जांभेकर विद्यालय, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग, नवनिर्माण हायस्कूलचा ग्रामीण शेतीदर्शन, मराठा मंदिर ग्लोबल स्कूलचा चित्ररथ, नगरपरिषेदचा पीएम आवास योजना, इव्हीएम मशीन आदींचा समावेश होता.

पालकमंत्र्यांच्या हस्ते अनुकंपाखाली नियुक्तीपत्र

दैनंदिनी रोशन आंबेकर हिला जिल्हा माहिती कार्यालयातील शिपाई पदावर पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांनी याबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय विजेते निलिमा आखाडे, ज्युली रहाटे, रिध्दी माळी, मृण्मयी चिंचचौरे, साक्षी आंब्रे, गौरव सावंत, स्वरुप शिरगावकर, मानस गावकर, श्रृती पडघन, यश खामकर यांना प्रत्येकी १ लाख बीज भांडवल व प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन पालक मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि बी के एल वालावलकर यांना प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यांनतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page