
रत्नागिरी: निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ व्यस्त असणे, उमेदवारी अर्ज भरण्यातील अडचणी यामुळे उमेदवारी अर्ज भरायचे प्रमाण फारच कमी होते. पाचव्या दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी शिवसेना – भाजपसह अपक्षांचे 17 अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल झाले आहेत. या पाचव्या दिवसापर्यंत आता एकूण 20 उमेदवारी अर्ज आले आहेत. व्यस्त संकेतस्थळ आणि उमेदवारी अर्ज भरण्यातील अडचणींमुळे निवडणूक आयोगाने रविवारी सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा दिली आहे. सोमवार 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
शनिवारी शिवसेनेचे विजय खेडेकर, सुहेल साखरकर, राजन शेट्ये, दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, निमेश नायर, सौरभ मलुष्टे, गणेश भारती, श्रद्धा हळदणकर, आफ्रिन होडेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्याचबरोबर भाजपच्या वर्षा ढेकणे, सुप्रिया रसाळ, समीर तिवरेकर, मानसी करमरकर, राजेश तोडणकर यांचे अर्ज दाखल झाले आहेत. नितीन जाधव रविवारी अर्ज भरणार आहेत. अपक्षांमध्ये संकेत चवंडे, शाहीद वस्ता आणि प्रहार जनशक्तीच्या सोनाली केसरकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा असल्याने या दिवशीही मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरु झाल्यानंतर गेल्या सोमवारपासून शुक्रवारपर्यंत केवळ तिनच अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज प्रथम ऑनलाईन भरून त्याची प्रत रत्नागिरी नगरपरिषदेच्या हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यायची असते. एकाचवेळी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असल्याने निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ फारच व्यस्त होते. त्यामुळे त्या संकेतस्थळावर वेळेत अर्ज भरला जात नव्हता. त्याचबरोबर उमेदवारी अर्जात फारच लहान सहान गोष्टी भरायच्या असल्याने तो भरतानाही अडचणी येत होत्या. आता मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत जवळ आल्याने सर्वच उमेदवारांची धावपळ उडाली आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर