
मुंबई- नितेश आणि नारायण राणे.
आमदार नितेश राणे सातत्याने वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. कधी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावरील टीका असो तर कधी राजकीय वाद असो. नितेश राणे नेहमीच चर्चेत असतात. नितेश राणे यांचे वडील नारायण राणे हे मूळचे शिवसेनेतले. त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही शिवसेनेपासून झाली. शिवसेनेत असताना नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील झाले. परंतु २००६/०७ च्या दरम्यान, त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच काही वर्षांनी त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. हा पक्ष २०१९ मध्ये नारायण राणे यांनी भाजपात विलीन केला. भाजपाच्या तिकीटावर नितेश राणे कणकवलीत आमदार झाले. तर नारायण राणे खासदार आणि केंद्रीय मंत्री देखील झाले.
दरम्यान, नितेश राणे नुकतेच त्यांच्या राजकीय प्रवासावर बोलले. ते एबीपी माझ्याच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नितेश राणे म्हणाले, मी २००६ पर्यंत लंडनमध्येच होतो. त्यावेळी मी आईला सांगितलं मला इथेच राहायचं आहे, यासाठी काही करता येईल का? पण मला व्हिसा मिळाला नाही. मग मला परत यावं लागलं. मला परत यायची ओढ नव्हती. पण वडिलांची इच्छा होती शिक्षणानंतर मी परत यावं आणि इथे काम करावं. त्यानंतर मी २००६/०७ च्या दरम्यान भारतात परत आलो. तेव्हा साहेबांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २००९ ला साहेबांनी विचारलं निवडणूक लढतोस का, पण मी वेळ घेतला.
