
रायगड- राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील इर्शाळवाडी गावामध्ये रात्री मोठी दुर्घटना घडली आहे. इर्शाळवाडीवर दरड कोसळली असून या दुर्घटनेत आत्तापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच गावावर दरड कोसळल्याने किमान ४० ते ५० घरं मलब्याखाली दबल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आलं असून घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेची बातमी समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी घटनास्थळाचा व बचावकार्याचा आढावा घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरापर्यंत रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होता. त्यावेळी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास इरशाळवाडी या गावावर भलीमोठी दरड कोसळली असून यात चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या गावात ५० ते ६० घरांची वस्ती आहे. परंतु ढिगाऱ्याखाली ४० ते ५० घरं असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर आता घटनास्थळी नागरिकांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. इर्शाळवाडी हे गाव इर्शाळगडाच्या पायथ्याशी आहे. त्यामुळं या भूस्खलनाच्या घटनेत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
त्यानंतर आता राज्य सरकारकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत असल्याने एनडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रायगडच्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याची घटना समजताच राज्याचे उद्योगमंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे हे तातडीने मुंबईहून घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळाची आपातकालीन पाहणी करत मंत्र्यांनी तातडीने मदत व बचावकार्य सुरू करण्याच्या सूचना केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील इर्शाळवाडी येथील भूस्खलनाच्या घटनेची माहिती घेतली आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.